माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩
१६७४ ला किल्ले रायगडावर
राज्याभिषेक राजांचा झाला
अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी
राजधानीसाठी होता निवडला

सुर्यास्तावेळी दरवाजे बंद होत
चिटपाखरू नसे तिथे फिरकत
राजांनीच लावली होती शिस्त
पहारेकरी आज्ञापालन करीत

कडक शिस्तीच्या वातावरणात
झाली होती घटना एक विपरीत
हिरा धनगरीण होती वाकुसरीत
दुध विकुनी होती घर चालवित

रोज गडावरती येणं- जाणं होतं
दुध विकुन घरी होती ती परतत
घडल त्यादिवशी भलतं आक्रीत
झाली हीच हिरा गडामधे बंदिस्त

बसली ती पहारेकऱ्यांना विनवत
पहारेकरी दरवाजा नव्हते उघडत
राजाज्ञेचं पालनच होते ते करीत
हिरकणीने सोडलीच नाही हिंमत

गडावरी फिरली होती वाट शोधत
तान्हुल्यासाठीच हिरा माई चिंतीत
प्रयत्नांचीही केलीच तिने शिकस्त
तरीही मार्ग नव्हता तिला सापडत

चमत्कारच झाला जणू एका क्षणात
हसु आलचं थोर हिरामाईच्या मनात
एक कडा आला होता तिच्या नजरेत
तिथुन उतरताना जीव होता धोक्यात

विचार स्वत:चा नव्हता तिच्या ध्यानात
तान्हुल्याचीच चिंता तीच्या काळजात
ऊतरली गड वाघीण बाळाला आठवत
जाहल्या होत्याच जखमा तिला अनंत

घरी पोहोचली लेकराच्या ओढीने धावत
काळजाच्या तुकड्यास पाहुन हर्ष मनात
वार्ता ही ऐकुनी राजेही पडलेच संभ्रमात
साडी-चोळी बहाल केली हिराला गौरवत

हिराच्या नावाने बांधला बुरुज रायगडात
हिरकणीवाडी गावही प्रसिद्ध ईतीहासात
अभिमान वाटतो हिरकणीमाईचा सतत
करते वंदन हिरकणीमाईला मनात जपत

🚩🚩🚩जय शिवराय 🚩 🚩 🚩
...हिरकणी मातेचा विजय असो...
🚩🚩🚩जय शिवराय 🚩 🚩🚩

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
१७ फेब्रुवारी २०२२


रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

स्वराज्यसौदामिनी ताराराणी

ई. सन १४ एप्रिल १६७५ रोजी 
मोहीतेंच्या घरी कन्या जन्मली
पत्नी राजारामांची ती जाहली
महाराजांची स्नुषाही शोभली

वैधव्यानंतरही नाही ती खचली
मराठ्यांची गादीही सांभाळली
बाळाजी , उदाजी आदी सोबत
पन्हाळा किल्ला लढुन जिंकली

कारंजा राजधानी तिने बनवली
रामचंद्रपंत अमात्यांच मार्गदर्शन
ईतिहासातील यशस्वी स्त्री ठरली
भद्रकाली ठरवले सार्थ संबोधन

मोघलांशी नेहमी लढत राहीली
रणरागिणीच ताराराणी बनली
९ डीसेंबर १७६१रोजी निवर्तली
अंजिक्यतारावर समाधीस्त झाली

🤺👸🏻🤺👸🏻🤺👸🏻🤺👸🏻🤺👸🏻🤺

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
१३ फेब्रुवारी २०२२

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

पराक्रम पावनखिंडीचा

पावनखिंड म्हणजेच मुळची घोडखिंड ही दोन डोंगरांच्या मध्ये वसलेली एक अतिशय अरूंद अशी खिंड आहे... इतकी अरुंद की, या खिंडीतून केवळ एका घोडेस्वाराचचं जाणं-येणं शक्य होत त्यामुळेच या खिंडीच नाव "घोडखिंड होत. पन्हाळगड व विशाळगड या दोन गडांमधील अंतर घोडखिंडी मुळे कमी झालेल होत.

ई.स. २ मार्च १६६०ला सिद्दी मसूद याने पन्हाळगडास वेढा घातला व राजे अडचणीत सापडले. पुढे पावसाळ्यातही मसुदचा हा वेढा सुटेना. या गंभीर परीस्थितीतुन मार्ग काढण्यासाठी शिवरायांनी " शिवा काशिद " यांच्यासह मिळून गनिमी कावा केला. शिवा काशिद यांची अंगकाठी व नावं राजांशी मिळतं-जुळतं असल्याने राजांची ही क्लृप्ती कामी आली व सुमारे १३ जुलै १६६० रोजी महाराज पन्हाळगड्याच्या वेढ्यातुन निसटले.

काही वेळानंतर सिद्धी मसुदला सत्य कळाले व त्याने अतिशय निर्दयीपणे शिवा काशिद यांची हत्या केली तर ३००० सैनिकांची एक तुकडी शिवरायांच्या मागावर पाठवली. पुढेही शत्रु व मागेही शत्रु अशी त्यावेळी शिवरायांची अवस्था झाली. अशावेळी प्रसंगावधान राखत बाजीप्रभू व त्यांचे बंधु फुलाजी प्रभु यांनी राजांना विशाळगडाकडे कुच करण्यास सांगीतले.आम्ही तोपर्यंत खिंड लढवतो असे वचन दिले ,परंतु बाजी ईतर मावळ्यांना अशा गंभीर परीस्थितीत सोडून जाण्यास राजांच मन मानतचं नव्हतं...मग बाजींनी थोडसं दरडावून व निक्षुन राजांना सांगितले की...,
" राजे , लाख मेले तरी चालतील ,परंतु लाखांचा पोशिंदा जगायलाच हवा , तुम्ही निश्चिंत मनाने विशाळगडाकडे निघा व गडावर पोहोचताच तोफांना बत्ती द्या. जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही , तोपर्यंत एकाही गनिमाला ईंचभर पुढे हलू देणार नाही. "

हे ऐकल्यावर मात्र राजांचा नाईलाज झाला व जड अंतःकरणाने ते ३०० मावळ्यांसह विशाळगडाकडे रवाना झाले.

उरलेल्या ३०० मावळ्यांसह बाजी प्रभू, फुलाजी प्रभु प्राणपणाने लढले. अनेक वार बाजींच्या अंगावर झाले..पण बाजींना तसुभरही फरक पडत नव्हता. हर हर महादेव म्हणत हा नरसिंह त्वेषाने शत्रुंवर तुटुन पडत होता. बाजींचा हा जोश बघुन मावळ्यांच्या अंगातील रक्तही ऊसळत होत. दोन्ही हातात तलवारी घेऊन बाजी शत्रुला कापत होते. बाजी लढत असले तरी त्यांच सगळं लक्ष तोफांच्या आवाजाकडेच लागलं होत. दोन्ही बाजूंच्या या धुमश्चक्रीत एक घाव बाजींच्या वर्मी लागला... तरीही बाजी लढतच राहीले... तोपर्यंत... जोपर्यंत विशाळगडाहुन तोफांचा आवाज आला नाही.... अखेरीस तो आवाज आला व बाजींनी समाधानाने आपला प्राण सोडला.

बाजींच्या मृत्युनंतर मावळेही मारले गेले. मावळ्यांच्या रक्ताने  पावन झालेली घोडखिंड या घटनेनंतर "पावनखिंड" म्हणून ओळखली जाऊ लागली.

धन्य होते सर्व मावळे , धन्य होती त्यांची शिवरायांवरील निष्ठा....धन्य होते शिवराय...!!

मानाचा त्रिवार मुजरा सर्व मावळ्यांना व शिवरायांना
...🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️...

🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
(वैशाली पडवळ)
११ फेब्रुवारी २०२२


रविवार, ३० जानेवारी, २०२२

प्रयत्नं

करावा प्रयत्नं
मानु नये हार
कष्टांनी तुमच्या
यश लाभणार

करा मेहनत
यश प्राप्तीसाठी
जपा स्वाभिमान
तुम्ही स्वत:साठी

लाभेल ईश्वर
ह्याच प्रयत्नांती
करता प्रयत्नं
होईल प्रगती

ही परीश्रमाची
जोड प्रयत्नांस
खात्री वाटे मग
यशाची मनास

ठेवा जीवनात
सकारात्मकता
नांदेल मनात
तुमच्या शांतता

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
 ३१ जानेवारी २०२२

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

हे गीत गाऊया ( बाणाक्षरी )

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तिरंग्याचा असे खुप अभिमान
देशासाठी देऊ वेळप्रसंगी प्राण
देशभक्ती हेच जगण्याच कारणं
राखु भारतीय संस्कृतीचा मान
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
रक्षा करण्यास देशाची
सैनिक लढती जोमाने
रक्षा मग त्यांच्या देहाची
मस्तकी लावुया गर्वाने
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳बाणाक्षरी🇮🇳🇮🇳         
        हे 
       गीत
     गाऊया
   देशभक्ती
  मनी वाढवू
आपण मिळुनी
भारत मातेप्रती
      वंदन
      मातेला
      करुया
      सारेच
      महत्व
      जाणुया
       क्रांतीचे

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
(वैशाली पडवळ )
२६ जानेवारी २०२२

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

आयुष्याच्या चित्रपटातील आपण कलाकार ( द्रोणकाव्य )

आयुष्याच्या चित्रपटातील आपण कलाकार
   सुख-दुःखाच्या भुमीका सदैव वठवणार
      संकटांशी लढताना कधी न हरणार
     ज्योत सकारात्मकतेची मनी जळणार
       भूमीका आपली चोख साकारणार
          संकटातही कधी न खचणारं
           अडचणीत धीरही देणार
             जीवननाट्यात रमणार
              न्याय भूमिकेस देणार
                जिवंत भासवणार
               भुमीकाही स्वत:ची
                ‌    सुरेख होणार
                    हा आविष्कार
                       लाभणार
                        आनंद
                         खास
                           हा
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

२३ जानेवारी २०२२

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

कहाणी तिच्या जिद्दीची..!!

" राष्ट्रीय कन्यादिनानिमीत्त खास कथा "

👩🌹👩♥️🙏🧚🏻‍♀️♥️🙏👩🌹👩

             आपल्या एसी गाडीत बसून आजूबाजूचं निसर्गसौंदर्य पाहत आपली आवडती गाणी ऐकत श्रेयाचा प्रवास चालू होता...!!

               कोण होती श्रेया...??

             श्रेया सबनीस...!!

     एक प्रथितयश माॅडेल , बालीवूडवर अधिराज्य गाजवणारी आघाडीची नटी , माजी विश्वसुंदरी , आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी सौंर्दयाची खाणं...!!

         तिचं सौंदर्य शब्दात वर्णन करणं तसं कठीणच...!!
आज काय नव्हतं तिच्याकडे. सर्वसामान्य माणूस ज्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही , अशा सर्व अत्याधुनिक महागड्या सोयीसुविधा उपलब्ध होत्या तिच्याकडे...!!

        प्रॉपर्टी , बँक बॅलन्स यांची तर गिणतीचं करणं सोडलं होतं तिने आता...!!

        आपल्या गाडीत मनपसंत गाणी ऐकत प्रवास करत असताना ..., "  मॅम , ईथे थांबायचं का जेवण्यासाठी ??"
अचानक आलेल्या ड्रायव्हरच्या आवाजाने श्रेया भानावर आली. ( एका सप्त तारांकित /७ स्टार हॉटेल समोर ड्रायव्हरने गाडी थांबवून विचारलं होतं...!!)

         पण श्रेयाने निघतानाच नाष्टा केलेला असल्याने , तसेचं ती डायटिंग करत असल्याने ती ठराविक वेळेवरचं जेवण करत असायची. म्हणून तिने ड्रायव्हरला पैसे देऊन जेवून येण्यास सांगितले व स्वत: गाडीतचं थांबली. ( आधी तर , ड्रायव्हरने पैसे घेण्यास नकार दिला ,पण श्रेयाच्या आग्रहापुढे त्याचे काही चालले नाही , त्यामुळे तो जेवण्यास निघून गेला.)

         श्रेया एकटिच गाडीत बसून होती. गाणे ऐकून कंटाळा आला असल्याने, तिने आपल्या मोबाईल मध्ये व्हिडीओ पाहण्यास सुरुवात केली. ईतक्यात गाडीच्या बंद असणारा काचेवर टकटक झाली. तिने व्हिडिओ बघताना डिस्टर्ब झालं म्हणून थोडसं चिडून बाहेर पाहिलं असता , बाहेर एक लहान मुलगी होती , जी पुस्तकं विकत होती....!!

         श्रेयाला वाचनाचा छंद असला तरी पुस्तक वाचण्यास  हवा तसा निवांत वेळ मिळत नसायचा, पण तरी तिने ती सर्व पुस्तकं विकत घेण्याचा निर्णय घेतला. पुस्तकांची किंमतही न विचारता तिने त्या मुलीकडील सर्व पुस्तकं विकत घेतली व तिला पाच हजार रुपये देऊ केले. ती मुलगी आश्चर्यचकित होऊन म्हणाली ,
" दिदी एवढे पैसै , ह्या सर्व पुस्तकांची किंमत मिळून २००० /- रू. च्या आसपास असेल , तेवढेच पैसै द्या मला. " 

      मुलीचा प्रामाणिकपणा खुप भावला श्रेयाला , व त्या गरीब पण स्वाभिमानी मुलीचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये म्हणून श्रेया तिला म्हणाली....,

          " बरोबर आहे बच्चा तुझं , पण काय आहे ना तु मला दिदी बोललीस ना, मग दिदीच ऐकणार नाही का?? , २००० रू./- तुझ्या पुस्तकांचे आणी उरलेल्या पैशांत तुझ्यासाठी छान कपडे , खाऊ , खेळणी घे. मीचं आले असते तुझ्यासोबत शाॅपिंगला पण... , मला आता जायचं आहे ना लगेचचं , म्हणून हे पैसे दिले तुला , गैरसमज करून घेऊ नकोस ग बाळा...!!"

        श्रेयाच्या या प्रेमळ शब्दांनी ती मुलगी खूप भारावून गेली व " धन्यवाद ताई "असं म्हणून हसत-नाचतचं निघून गेली.

        ती मुलगी आली तशी गेली पण श्रेया मात्र विचारात हरवून गेली . त्या मुलीत ती जणू स्वत:ला पाहत होती...!!

        हो स्वत : लाच....!! 

     श्रेयाचं लहानपण खूप हलाखीत गेलं होतं. तिच्या आईचा प्रेमविवाह झालेला होता , तोही एका मुस्लिम तरुणाशी. तिची आई हिंदुधर्मीय होती तर वडील मुस्लिम असल्याने त्यांच्या लग्नाला विरोध झाला होता , पण तरीही श्रेयाच्या आईने घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने माहेरचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे बंद झाले होते. शिवाय ती अस्लमची तिसरी बायको आहे हे सुद्धा तिला लग्नानंतरचं समजलं होतं .

      आपण केलेल्या कृत्याचा श्रेयाच्या आईला पश्र्चाताप होतं असला तरी आता काय उपयोग होता या सगळ्याचा...!!

     म्हणून श्रेयाची आई अस्लमच्या मुस्लीम बायकांकडून , सासू- सासर्यांकडून होणारा छळ सोसत जिद्दीने तिथेच राहीली होती , कारण अस्लम मात्र , तिच्याशी चांगलं वागत होता..!!

      मग अश्याच परीस्थितीत श्रेयाचा व तिच्या भावाचा जन्म झाला व प्राॅपर्टीवरुन घरात वाद सुरू झाला. श्रेयाच्या  आईवर  तिच्या वडीलांच्या दुसऱ्या बायकांकरवी प्राणघातक हल्ला झाला व तिला हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले , तिचे वडील अशा प्रसंगी श्रेया व तिच्या भावाची साथ न देता आपल्याला अटक होईल या भितीने फरार झाले...!!

      आईचा इलाज करण्यासाठी ही त्या भावंडाजवळ पैसा नव्हता , खुप भयानक प्रसंग ओढवला होता श्रेया व तिच्या भावावर....!!

      आईवर उपचार करण्यासाठी त्यांना लोकांकडून भिक मागावी लागली , काही दयाळू लोकांनी मिळून त्या भावंडांची मदत केली व श्रेयाच्या आईचा उपचार झाला पण तरीही श्रेयाच्या आईला काही महीने बेड रेस्ट करण्यास सांगितले गेले होते....!!

     अश्या परीस्थितीत श्रेयाने हार न मानता ती जीद्दीने उभी राहिली , आपला घरखर्च चालवण्यासाठी ती शिक्षणाला रामराम ठोकून धुण्याभांड्याची , साफसफाईची कामे करू लागली. तिचा भाऊ एका कुल्फीवाल्याला त्याच्या कामात मदत करत असे. असे करुन ती भावंडं जिद्दीने घरखर्चाचा गाडा हाकत होते. मग नंतर श्रेयाची आई आजारातून पुर्ण बरी झाली व घराची सुत्र तिने आपल्या ताब्यात घेतली. आता त्यांनी पशूपालन / दुग्धव्यवसाय करण्यास सुरुवात केली व त्यांची परीस्थिती थोडीशी सुधारली.

        ते ज्या परीसरात राहत होते त्या परीसरात श्रेया व तिच्या भावाचं गुणगान गायलं जाऊ लागलं. तिच्या वडीलांना त्यांच्या मुलांनी घरातून हाकलून दिलं, त्यामुळे मग तेही श्रेयाच्या आईकडे परत आले व श्रेयाच्या आईनेही मोठे मन करून , हिंदू संस्कृतीनुसार कुंकवाच्या धन्याला माफ केलं व घरात स्थान दिलं....!!

        असेचं दिवस जात होते, कधी चांगले तर कधी वाईट पण , एकच गोष्ट चांगली होती ती म्हणजे ते सर्व एकत्र होते.
असेच एक दिवस शेजारील काकूंनी त्यांच्या मुलीचा फोटो काढत असताना, श्रेयाला बरोबर येण्याचा आग्रह केला व  आपल्या मुलीबरोबर श्रेयाचेही काही फोटो काढण्यास फोटोग्राफरला सांगितलं व तिथेच तिचं नशीब पालटलं...!!

        तिचा फोटो खुप सुंदर आला व त्यामुळे त्या फोटोग्राफरने तो फोटो त्यांच्या मॅक्झिनमध्ये छापण्यास देऊ का ?? अशी विचारणा तिच्याकडे केली...!!

       हाच तो क्षण होता जेव्हा श्रेयाला समजलं , कि ती किती   सुंदर दिसते. मग श्रेयाने मनाशी काहीतरी ठरवलं व तिने आपलं गाव सोडून मुंबईला येण्याचा निर्णय घेतला...!!

        तशी हीरोइन बनण्याची इच्छा तिला लहानपणापासूनच होती , पण आता फोटोग्राफरच्या कौतुकामुळे त्याला खतपाणी मिळालं होतं . तिच्या आई-वडिलांचा तिला एकटीला शहरात पाठवण्यास विरोध होता. त्यामुळे एक दिवस अंगावरील कपड्यांनिशी व तुटपुंज्या पैशांसह श्रेया मुंबईला पळून आली.

         पण स्वप्ननगरी मुंबईत आल्यावर मात्र , तिला खरी परिस्थिती समजली व पश्र्चातापही होऊ लागला. पण ती हार मानणाऱ्यांतली नव्हतीचं....!!

      तिने दिवस-रात्र संघर्ष केला.अगदी रेल्वे स्टेशनवर झोपून व रेल्वे स्टेशन वरील स्वच्छतागृहात आंघोळ करून , वेळप्रसंगी वडापाव खाऊन दिवस काढू लागली. तिला कळालं की तिच्या सारख्या अनेक मुली येथे हीरोइन बनण्यासाठी आल्या आहेत , रोजचं येतात....!!

          तिने खूप संघर्ष केला , खूप हलाखीत दिवस काढले . तिला अनेक वाईट अनुभवही आले पण त्या प्रत्येक अनुभवातून ती शिकत गेली , घडत गेली. तिच्या घरच्यांनी असा समज करून घेतला होता की ती कोणत्यातरी मुलाबरोबर पळून गेली...!! 

     तिच्या खऱ्या परिस्थितीबद्दल फक्त तिच्या भावाला माहित होतं , पण तिने भावाला आपल्या आई-वडिलांना काही सांगण्यास मनाई केली होती.

    मुंबईत कधी उपाशीपोटी राहून , कधी वडापाव खाऊन तर कधी नुसतंच पाणी पिऊन ती दिवस काढत होती. प्रत्येक दिवस भलाबुरा अनुभव घेऊन येत होता. तिचं व्यक्तिमत्व घडवण्यात मदत करत होता आणखी शेवटी तिने एका सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला व तिच्या नशिबाने पुन्हा एकदा कलाटणी मारली. ती त्या स्पर्धेत पहीली आली व नंतर तिने विश्वसुंदरीचा किताबही आपल्या माथ्यावर आणून बसवला...!!
    त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर येणं सुरु झालं..!! तीची राहण्याची स्थिती मात्र तोपर्यंत सुधारलेली नव्हती. ज्या स्त्रिने तिला सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यास प्रवृत्त केले होते. तिनेंचं आपल्या मोकळ्या असलेल्या घरात तिची राहण्याची व्यवस्था तर केली होती खरी , पण तरीही श्रेयाकडे घरातील कोणतेच सामान नव्हते. मग तिच्या शेजारच्या माणसांनी तिची मदत केली व तिला आपल्या अडगळीच्या खोलीत ठेवलेली शेगडी व इतर काही भांडी , तसचं काही गरजेच्या वस्तू तिला दिल्या....!! ( कारण तिने आपल्या स्वभावाने सर्वांचे मन जिंकून घेतलं होतं. )

         मग हळूहळू तिची परिस्थिती सुधारू लागली. ती मन लावून चित्रपटसृष्टीत काम करत असल्याने , एक दिवस एका मोठ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली व तो चित्रपट तिच्यासाठी मैलाचा दगड ठरला....!!

         तो चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर , अशा अनेक चित्रपटांच्या ऑफर तिला येऊ लागल्या. यश जणू तिच्या पायाशी लोळणचं घेत होतं. एक दिवस तिच्या आई-वडिलांनी तिची मुलाखत टीव्हीवर पाहिली तेव्हा त्यांना अगोदर विश्वासचं बसला नाही. नंतर जेव्हा त्यांनी तिच्या भावाला त्याबाबत विचारणा केली तेव्हा ही गोष्ट खरोखरचं खरी आहे हे त्यांना पटलं. मग त्यांना आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटला....!!

         " निघायचं का मॅडम आता " जेवून आलेल्या ड्रायव्हरच्या आवाजाने श्रेया भानावर आली...!!
        
        आपला आजवरचा प्रवास आठवून श्रेयाच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते त्यामुळे " हो " ईतकचं बोलू शकली ती ड्रायव्हरला....!!

         गाडी सुरू झाली व श्रेया पुन्हा आपल्या विचारात हरवली. श्रेयाने आपल्या मेहनतीने स्वतःला चित्रपट सृष्टीत सिद्ध केलं होतं. कधी- काळी भीक मागितलेली श्रेया आज अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करत होती. इतकेच नव्हे तर तिचा स्वतःचा एक एन. जी .ओ. सुद्धा होता....!!

         एक काळ असा होता की तिला दोन वेळचं जेवणही मिळत नसे पण आता मात्र सर्व सुख तिच्या पायाशी लोळण घेत होती. ती कामात इतके बिझी असायची की स्वतःचे छंद पूर्ण करण्यासाठी निवांत वेळही मिळत नसायचा तिला. तिची इच्छा होती , की तिच्या कुटुंबानेही तिच्यासोबत शहरात राहावे , पण तिच्या आई-वडिलांना मात्र गावचं आवडत असल्याने , त्यांनी तिथेच राहणं पसंत केलं होतं...!!

         श्रेयाने त्यांच्या म्हणण्याचा आदर केला होता पण ती मात्र न चुकता दिवाळी, ईद , होळी , गणपती अशा ठरावीक सणांसाठी आपल्या कामांना सुट्टी देऊन आपल्या आई-वडिलांकडे गावी राहण्यास येत असे. जमवता येतील तितके आनंदाचे क्षण व नवी ऊर्जा घेऊन ती शहरात येत असे...!!

         आजही ती अशीच आपल्या बिझी शेड्युलमधून
वेळ काढून , आपल्या जन्मगावी आई-वडिलांना भेटण्यास चालली होती . आईच्या हातचं चविष्ट जेवण खाण्यासाठीचं , तिने आपली भुक शिल्लक ठेवली होती. ( ही तिची नेहमीची सवय ड्रायव्हरला माहीत असल्याने त्याने हॉटेलमध्ये
जेवण्याचा आग्रह  तिला केला नव्हता...!!)

         श्रेयाने आजवर खूप कठीण प्रसंग पाहिले होते. कमी वयात खूप संकटांचा सामना केला , पण तिने आपली जिद्द सोडली नाही. तिच्या संघर्षात तिला वाईट माणसांप्रमाणे चांगली माणसही खूप भेटली..., 

       त्यांची ती नेहमीच ऋणी असते...!!

 🌹👩🌹🙏🧚🏻‍♀️🙏🌹👩🌹  

           कथा : काल्पनिक  

       तर , अशी ही कहाणी तिच्या जिद्दीची...!!
(कशी वाटते , प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा...!!🙂)
              
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  ©️®️                                 
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू 
( वैशाली पडवळ )
२४ जानेवारी २०२२                      
  
       

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...